Monday, November 7, 2011

देऊळ

फार अपेक्षा ठेवून सिनेमा बघायला गेलो की कधी कधी निराशा होते असं म्हणतात. पण देऊळच्या बाबतीत मात्र असे नाही. नाना पाटेकर,दिलीप प्रभावळकर, मोहन आगाशे, गिरीश कुलकर्णी, नसीरुद्दीन शाह अशी मोठ्ठी नावं ऐकली की अपेक्षा उंचावतात. देऊळ हा सिनेमा तुमच्या एका चांगल्या मूवी कडून असलेल्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करतो. 
संपूर्ण सिनेमात एकच  पात्र सर्वाधिक प्रभावी  ठरते ते म्हणजे गिरीश कुलकर्णी यांनी रंगवलेले केशा.
नावाप्रमाणे सिनेमाची कथा एका देवळाभोवती फिरते. गावातल्या एका साध्या तरुणाला, केशाला, गावाबाहेरच्या डोंगरावरील झाडावर दत्त प्रकटलेत असे स्वप्न पडते. गावात सगळीकडे हे कळल्यानंतर, स्थानिक पुढारी हॉस्पिटलाऐवजी तेथे देऊळ बांधतात. देऊळची  त्याप्रमाणे सर्वत्र प्रसिद्धी केली जाते. त्यातून गावाला आणि गावकर्यांना आर्थिक लाभ सुरू होतो. गावात सर्वत्र बदल घडून येतात.  पण यातून कुठेही भक्तित वाढ होत नाही तर फक्त पैशात वाढ होते. देवाचा देखील अखेरीस फक्त व्यवसाय होतो. हे सगळे केशाला जाणवू लागते आणि तो खूप दुखावतो. शेवटी ज्या गायीच्या निमित्ताने त्याला दत्ताचे दर्शन झाले ती देखील मरणासन्न असतांना तिची काळजी घेतली जात नाही. केशा या सगळ्याला वैतागून एक  अनपेक्षित कृती करतो. ही झाली ढोबळमानाने सिनेमाची पटकथा.
उत्तम आणि भूमिकेला न्याय देऊ शकणार्‍या कलाकारांची निवड हे देऊळ चे सर्वात मोठे बलस्थान. सगळ्या कलाकारांनी आपापल्या भूमिका अगदी उत्तम वठविल्या आहेत.
गिरीश कुलकर्णिंचा कुठलाही सिनेमा मी या आधी पाहिलेला नाही. या सिनेमातला त्यांचा अभिनय अत्यंत उत्तम झाला आहे. गावाकडील भाषेचा ढन्ग त्यांनी लीलया उचलला आहे. केशाचा भाबडेपणा, त्याचं देव्भोळ  असणं, त्याचा दत्ताचा साक्षात्कार झाल्या नंतरचा आनंद हे सगळं काही गिरीश यांनी फार छान रित्या प्रेक्षकांपर्यंत पोचवले आहे. शेवटी केशाची  झालेली घालमेल, घुसमट ही तुमच्या आमच्या मनाला अस्वस्थ करते.
हा सिनेमा कुठलाही मेसेज तुम्हाला देत नाही. म्हणजे अशी अशी परिस्थिती असेल तर असं असं वागावं असे काहीही सूचीत केलेले नाही. मात्र डोळे उघडे ठेवून बघायला सांगितले आहे. आम्ही आपले मंदिर दिसले की डोके टेकवतो त्यापलीकडे फारसा विचार करत नाही. त्यामागे एवढी पैशाची उलाढाल असेल असा विचार देखील कधी कुणी केलेला नसतो. आपण सुद्धा किती तरी प्रती शिर्डी, प्रती बालाजी अश्या मंदिरात गेला असाल. पण त्या ठिकाणी खरेच तितके पावित्र्य आहे का याचा कुठेतरी विचार व्हायला हवा.   आपण देवळात का जातो? मनाला शांती मिळावी म्हणून, काही हवं असतं म्हणून अशी प्रत्येकाची कारणे वेगळी वेगळी असतात.
भौतिक सुखांच्या मागे किती धावायाचे आणि नेमका कशासाठी अट्टहास करायचा, का करायचा? ह्या सगळ्या प्रश्नांवर विचार करायला आपण भाग पडतो. "फोडा दत्त नाम टाहो" या गाण्यात आपल्या जीवन वर्तुळाचा धार्मिकतेशी कसा छेद जातो ते कळते.

काही अनावश्यक गोष्टी (आइटम सॉँग आणि नको तितके वास्तव दर्शन) वगळल्यास देऊळ हा चित्रपट अत्यंत उत्तम बनलाय. डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आहे हे नक्की. अवश्य बघा.