Friday, August 24, 2012

हिंदी में प्रथम प्रयास

हिंदी भाषा से परिचय काफी पुराना है | हिंदी फिल्मों के जरिये हो ही जाता है | हिंदी में लिखने का ये मेरा प्रथम प्रयास है | आशा है के पाठक इसे पसंद करेंगे | फिल्मों की बात निकली है तो क्यूँ न फिल्मों के बारे में ही बोला जाये? इस पोस्ट के लिए मुझे प्रेरणा दीप के ब्लॉग से मिली |  जिस सरलतासे दीप हिंदी तथा अंग्रेजी इस दो भाषाओँ लिखती है वो वाकई प्रशंसा के लायक है | उसकी आखरी पोस्ट फिल्मों के बारे में थी | ऐसी फिल्में जो दिल को छू जाये | जिन्हें देखकर कुछ सीखने को मिलें | जिनके किरदारों को कॉपी करने का दिल करे | ऐसी कई  फिल्में आज तक  बनी  हैं |  बावर्ची उन्ही में से एक है | मुझे सबसे ज्यादा पसंद मूवीज में से एक है | राजेशजीने निभाया हुआ रघु का किरदार जीवन सही ढंग से जीने की तरकीब बताता है | एक उलझे, बिखरे परिवार को रघु के बदौलत सहारा मिलता है | सहारा, कोई पैसों का सहारा नहीं है बल्कि भावनिक सहारा है | रघु परिवार के सारे लोगों को एक दुसरे से जोड़ता है| क्यूँ की दरारे तो सिर्फ गलतफहमी की वजह से थी | इतना ही नहीं पर वो उन्हें ये भी सिखाता है के कैसे  छोटी छोटी खुशियाँ जिंदगी में ढूंडकर उनसे आनंद पाया जा सकता है | इस फिल्म का एक वाक्य मुझे सबसे ज्यादा भा गया : इंसान किसी बड़ी ख़ुशी के इंतज़ार में न जाने कितनी छोटी छोटी खुशियों को महसूस नहीं करता| ये काफी हद तक सच भी है| हमारे लिए जीवन के उद्देश तय होते हैं | जब तक हम वो हासिल न कर लें हमें चैन और सुकून नहीं होता | इस दौरान आ चुकी  कई  छोटी छोटी खुशियों को हम नजरअंदाज कर देते  हैं 
और एक बात जो हम अक्सर भूल जाते है वो है परिवार के सदस्यों का महत्व | खुद के लिए तो जीना हर कोई जानता है पर औरों को खुश करने में जो मजा है वो और कहीं नहीं | इस बात पर मैंने भी गौर किया हैं के सचमे काफी ख़ुशी मिलती है अगर मैं किसी और को थोड़ी मदद कर दूँ तो | इस "और" में परिवार वालें तो होने ही चाहिए पर पडोसी, सहकर्मी भी हो सकते हैं | जब भी मैं बावर्ची देखती हूँ, इस बात का मुझ पर  कई दिनों तक असर रहता है| हाँ, हमेशा के लिए असर करना तो किसीभी तरह के मीडिया को संभव नहीं है | जब कोई दिल को चोट पहुंचा दे तो असर गायब हो जाता है | नॉर्मलसी बात है | 
बहुत कुछ लिखने का मन कर रहा है पर सोचती हूँ अगले पोस्ट के लिए बचाके रखूं |  नेक्स्ट पोस्ट में भी फिल्मों की ही बातें होंगी |  

Thursday, August 16, 2012

Autobiography of a Yogi अर्थात योगी कथामृत - 1


नववीत असतांना पहिल्यांदा योगी कथामृत हे पुस्तक हातात पडले. मी अगदी झपाटून गेल्यासारखे वाचून काढले. त्यातला काही भाग अर्थातच त्या वयात फारसा समजला नाही. पण एकंदरीत पुस्तक फार आवडले.
या पुस्तकात परमहंस योगानंदांनी त्यांचे आयुष्य अत्यंत प्रामाणिकपणे वाचकांसमोर मांडले आहे. त्यांच्या बालपणापासून तर अमेरिकेतल्या वास्तव्यापर्यंतचा काळ यात समाविष्ट होतो. लहानपणापासून योगीजींना असलेली आध्यात्मिक ओढ त्यांना काय काय करायला लावते हे सगळे सुरुवातीच्या काही प्रकरणांमध्ये येते. गुरूच्या शोधासाठी योगीजींनी घेतलेली धडपड मनाला स्पर्शून जाते. अंतर्बाह्य भिनलेले वैराग्य आणि मार्गदर्शक गुरूचा अभाव ह्या विरोधाभासी परिस्थितीत योगीजींना त्यांच्या आईचा मोठा आधार असतो. परंतु ती देखील त्यांच्या वयाच्या नवव्या वर्षी निर्वतते. नऊ हे खरे तर फार लहान वय. पण त्या वयात देखील योगीजींना असलेली समज थक्क करते. सतत अति उच्च दर्जाचे आध्यात्मिक अनुभव येत असताना त्यांना गुरूच्या मार्गदर्शनाचा फार अभाव जाणवत असतो. अखेरीस काही वर्षांनी त्यांना श्री युक्तेश्वर गिरी यांच्या सारखे महान गुरु लाभतात आणि त्यांची आध्यात्मिक वाटचाल सुकर होते.
या पुस्तकात बऱ्याच निरनिराळ्या स्तरावरील चमत्कारांचा उल्लेख आढळतो. योगीजींनी केवळ असा-असा चमत्कार झाला एवढेच सांगितले नसून त्या मागची कारण मीमांसा सुद्धा स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलाय. उदाहरणादाखल त्यातल्या कोबीच्या चोरीबद्दल बोलता येईल. योगिजी गुरुंसमवेत त्यांच्या सेरामपुर येथील आश्रमात राहत असतानाची हि घटना आहे. योगीजींनी आश्रमाजवळील जागेत एकदा फुलकोबी पेरली. बरीच मेहनत घेतल्यानंतर त्यांना पाच कोबी मिळाल्या. त्या त्यांनी गुरुचरणी अर्पण केल्या. गुरूंच्या सूचनेप्रमाणे त्यांनी त्या स्वतःच्या खोलीत पलंगाखाली एका टोपलीत नीट झाकून ठेवल्या. या नन्तर आश्रमातील सगळी मंडळी फिरावयास निघाली. थोडे अन्तर चालून गेल्या नंतर अचानक श्री युक्तेश्वरजीनि आपल्या शिष्यांना आश्रमाचे मागील दार बंद केले होते का हे विचारले. हि जबाबदारी योगीजींवर सोपवलेली होती आणि ती पार पाडायचे ते विसरले होते. हे लक्षात आल्या नंतर युक्तेश्वरजी म्हणाले कि याची शिक्षा म्हणून तुझ्या कोबितली एक कमी होईल आणि एवढे म्हणून त्यांनी आश्रमाकडे परतायला सुरुवात केली. आश्रम दृष्टीपथात आल्यानंतर सगळे बघतात तर काय एक वेडसर इसम कोबी हातात नाचवत आश्रमाच्या मागील दiराने बाहेर पडत होता. सगळे आश्रमात पोचेस्तोवर तो नाहीसा झालेला होता. यावर श्री युक्तेश्वरजींचे म्हणणे असे होते कि ज्याला उच्च दर्जाचे आध्यात्मिक अनुभव येतात अशाने हि आध्यात्मिक कार्य हि भौतिक जीवनातील काम टाळण्यासाठीची सबब म्हणून सांगू नये. या चमत्काराचे थोडक्यात स्पष्टीकरण द्यायचे झाल्यास ते असे देता येईल:प्रत्येक मानवी शरीर जणू रेडिओ आहे. असा रेडिओ ज्याला इच्छाशक्तीद्वारे उर्जा मिळते आणि ज्यातून वेगवेगळ्या इच्छारुपी लहरी बाहेर पडत असतात. श्री युक्तेश्वर स्वतः जणू काही शक्तिशाली रेडिओ स्टेशन आहेत. असे स्टेशन ज्याला हजारो इच्छारुपी लहरींमधून नेमकी हवी ती नेमकेपणे उचलता येते. आणि म्हणून त्यांनी त्या वेडसर माणसाची कोबी हवी अशी इच्छा ओळखून त्याला आश्रमाकडे जाण्यासाठी प्रेरित केले.

या छोट्याश्या प्रसंगातून बरेच काही शिकण्यासारखे आहे. आध्यात्मिक जीवनात तुम्ही कितीही प्रगती केलीत तरी तुमच्या भौतिक आयुष्यातील कर्तव्यापासून तुमची सुटका नाही. खरा गुरु आपल्या शिष्याला घडवण्यासाठी किती धडपडत असतो हे यातून दिसते. शिष्याच्या अंगी थोडीदेखील उणीव असू नये, तो एक उत्तम मानव व्हावा असेच त्यांना वाटते.

या पुस्तकाबद्दल आणखीही बरेच काही लिहिण्याजोगे आहे. पुढील post मध्ये बघूया.
टीप: वरील पुस्तक पुढील लिंकवर online वाचता येते.

Friday, August 10, 2012

तुमच्या आयुष्यातील सर्वाधिक महत्वाची व्यक्ती कोण?


वरील प्रश्नाचं माझ्याकडे एका शब्दात उत्तर आहे. कामवाली बाई! हो, सध्या तरी माझ्यासाठी तीच सर्वात महत्वाची आहे. तिच्या शिवाय दैनंदिन  जीवनाची चक्र सुरळीत फिरणं निव्वळ मुश्कील. प्रत्यक्ष परमेश्वराची देखील इतकी वाट पाहिली जात नसेल जितकी हिची पाहिली जाते. सकाळचे साडे नऊ वाजले कि मनात धाकधूक सुरु होते. आज madam येणार कि नाही? वेळेवर येतील न? विचार करून करून वैताग यायला लागतो. बरं, फोन करूनही बया फोन घेईलच याचा काही भरवसा नाही. दांडी मारण्यासाठी यांच्या कडे अनंत कारण असतात. आज काय तर मुलाला बर नाही, उद्या काय तर घरात पावसाच पाणी शिरलं, अचानक गावाला जावं लागलं इ. इ. 
माझ्या स्वयंपाकवाल्या बाईची काय खुबी सांगावी? जर ती नेहमीच्या वेळेवर आली नाही आणि मी फोन केलाच तर तिचे उत्तर असते: " मी उदयाला येते बगा ताय!" मी मनातल्या मनात चरफडते कि बाई गं उद्याचं सोड, आजच काय? जर स्पष्टच विचारले तर हजारो कारण असलेल्या पोतडीमधून एखादे काढून माझ्यावर फेकते. घे! तुला कारण हवंय न? असा आविर्भाव असतो. दुसऱ्या दिवशी जर उगवलीच तर आल्या-आल्या भरपूर गोड बोलणार हे नक्की. चुकून आदल्या दिवसाबद्दल जर विचारलंच तर म्हणणार :"ते काय असतंय ताई अवो सुखदुख सगळ्यांना असतंय बगा. कुन्नी सुटला नैवो त्यातून! तुमी नै का सुट्टी गेता? तवा मलाबी सुट्टी लागते वो!"

पगार वाढ हवी आहे हे सांगण्याची पद्धत तर तुम्ही यांच्याकडून शिकायला हवी. सरळ सरळ कधीही म्हणणार नाही कि मला पगार वाढवून हवाय. त्याऐवजी तिला कसा इतरांकडे जास्त पगार मिळतो ते ऐकवणार. अर्थात पगार जास्त म्हणजे तिथे काम देखील जास्तच असते.पण ते सांगायचे मात्र  कटाक्षाने टाळणार. अश्या वेळी मला प्रचंड राग येतो. कारण काम ठरवलं असतांना हि बया काहीही बोललेली नसते. 
घरात कुणी पाहुणे आले कि मग तर विचारायलाच नको. मला कोपऱ्यात गाठून सरळ चौकश्या सुरु: "कदी जानार ताय पावूने? तुमाला लय काम पडत असल ना?" दाखवणार  असं कि हिला माझ्याबद्दल फार काळजी वाटतेय, पण प्रत्यक्षात मात्र स्वतःच्या कामाची फिकीर असते! 

या बायका- बायकांमध्ये हि अनेक तऱ्हा असतात. स्वयंपाक करणारी बाई भांडी-धुणी करणाऱ्या बाई पेक्षा स्वतःला उच्च समजते.  स्वयंपाक करायला कशी जास्त अक्कल लागते हे दाखवायचा सतत प्रयत्न असतो. मला कसं स्वयंपाक उत्तम करणं जमत हे स्व-गुणगान एखादी जरी चूक दाखवली कि सुरु होतं. 
असो! हरी अनंत, हरी कथा अनंता च्या धर्तीवर बाई अनंत, तिच्या कथा अनंता!! त्यामुळे to be continued.......

Thursday, August 2, 2012

बघितलंत आम्ही काय करू शकतो ते?

काल  संध्याकाळी अचानक  मोबाईल  वाजायला लागला. वाटलं  असेल कुणाचा तरी फोन! फोन घेण्याआधी हे कुठे ठावूक होते कि पुढचे काही तास प्रचंड टेन्शन मध्ये जाणारेत? कळलं असं कि पुण्यात तीन ठिकाणी स्फोट झालेत. बातमीच हादरवून टाकणारी होती. त्यात नेमकं  कम नशिबाने टीवी सुद्धा बंद होता. फोनवरच आणखी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. स्फोट जिथे झाले होते त्या भागात कुणी आप्त अथवा परिचित नाहीयेत ना  याची खातरजमा केली. तर नेमकी भाची गरवारे कॉलेज जवळ अडकलेली! अखेरीस थोड्या वेळात ती देखील घरी सुखरूप पोचली. पण विचार आलाच कि हे कसं  होऊ शकतं? कारण आम्ही पुणेकर स्वतःला फार सेफ समजत होतो कालपर्यंत. उमगत नव्हतं कि नेमकं काय करावं? भाची सुखरूप पोचली म्हणून आनंद मानावा का कि आता आपण सगळेच एका मोठया संकटात सापडलोय म्हणून चिंता करावी. कारण जे आज घडलय ते पुन्हा पुन्हा घडू शकेल. मुंबैकारांप्रमाणे आता पुणेकर देखील रोज घरी पोचला कि हुश्य करायला लागेल कि चला बुवा आज तरी कुठे स्फोट झाला नाही! दिवसभर नवरा/ बायको एकमेकांना फोन करत राहतील; विचारतील कि जेवलात का? पण खरा उद्देश असेल कि बाबारे व्यवस्थित आहेस ना. ह्या सगळ्या गोष्टी त्या तासा दोन तासात डोक्यात येवून गेल्या.

मला तर असं  अजिबात वाटत नाही कि कुणी तरी निव्वळ खोडी काढण्यासाठी असं  काही करेल. झालेले स्फोट फारसे गंभीर नसले तरी एकंदरीत सगळ्या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहण्याची तीव्र गरज आहे. जर ऐन सणासुदीच्या काळात अश्या मोक्याच्या जागा टार्गेट होऊ शकतात तर खरे स्फोट घडवून आणण काय कठीण आहे? आपण असे निर्धास्त कसे राहू शकतो? जर स्फोट खरोखर तीव्र असते तर नुकसानाची कल्पनाच न केलेली बरी. जंगली महाराज रस्ता, देना बँक, मक्डोनाल्ड इ. सगळी ठिकाणे अत्यंत वर्दळीची आहेत. या वेळेला वाचलो पण भविष्यात काय वाढून ठेवलंय हे कुणाला ठावूक! अश्या परीस्थितीत आपण सगळ्यांनीच अतिशय सजग (विशेषतः गर्दीच्या ठिकाणी) राहणे आवश्यक आहे. बाकी काय, इतकच म्हणायचं कि आयुष्याचा काही भरवसा नाही.